PM Kisan Insttalment Update:पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि अॅग्रीस्टॅक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नावनोंदणी न केलेले सुमारे ६१ हजार शेतकरी असून, ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.
या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून, पीएम किसानच्या योजनेच्या निकषांत बसत नसल्यास त्यांचा लाभ बंद करावा.
असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिले आहेत. ही पडताळणी करण्यास महसूल, तसेच कृषी विभागाला सांगण्यात आले आहे.
डुडी यांनी याबाबत नुकतीच आडवा बैठक घेतली, त्यात हे निर्देश दिले आहेत, जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला अॅग्रीस्टॅक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी याची अद्याप नोंदणी केलेली नाही. तसेच या शेतकरी ओळख क्रमांकाची संलग्लता कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी केली आहे.
हा क्रमांक असल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच पीएम किसान योजनेत सहभागी असलेले आणि अॅग्रीस्टॅक योजनेत नावनोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांविषयी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे.
त्यानुसार हुडी यांनी या ६१ हजार शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश महसूल आणि कृषी विभागाला दिले आहेत.
या पडताळणीत संबंधित शेतकरी पीएम किसान योजनेचे निकष पूर्ण करत असल्यास त्याची अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला २२ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
मात्र, जे शेतकरी पीएम किसान योजनेत नोंदणीही करत नाहीत, अशा शेतकऱ्यांचा लाभ बंद करावा, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ७० हजार ७०० इतकी असून त्यातील सक्रिय शेतकऱ्यांची संख्या ४ लाख ३५ हजार ६८५ इतकी असून, हे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभघेत आहेत.
अद्याप नोंदणी का नाही?◼️ हे शेतकरी लाभ घेत असून, त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.
◼️ नोंदणी केल्यास संबंधित शेतकऱ्यांकडील एकूण जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार कोणत्या भागात जमीन आहे, याची माहिती अॅग्रीस्टॅक योजनेत द्यावी लागणार आहे.
◼️ ही माहिती दिल्यास पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळेच काही शेतकरी जाणीवपूर्वक नोंदणी करत नसल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे.
◼️ त्यासाठीच ही पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली.
१ लाख ३५ हजार १५ शेतकरी असक्रिय!◼️ सक्रिय नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ३५ हजार १५ असून, या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.◼️ जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आकडेवारीनुसार अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ७४ हजार आहे.