Land Record Satbara Utara:आपल्या नावावर जमीन असली तरी अनेक वेळा त्या जमिनीचा 7/12 उतारा (सातबारा) सामूहिक स्वरूपात नोंदलेला असतो. म्हणजे एकाच कागदावर एका गटातील अनेक मालकांची नावे आणि त्यांचे हिस्से नमूद असतात.
अशा वेळी काही कारणांनी आपला स्वतंत्र 7/12 हवे असेल, म्हणजे आपल्या नावावरचा उतारा वेगळा करून घ्यायचा असेल, तर काय प्रक्रिया करावी? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
सामूहिक 7/12 उताऱ्यातून वेगळा उतारा काढण्याची प्रक्रिया ‘फाळणी’ किंवा ‘विभाजन’ म्हणून ओळखली जाते. यासाठी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो.
फाळणीची प्रक्रिया कायदेशीर स्वरूपात ठरलेली आहे आणि यात सर्व संबंधित मालकांचा सहभाग आवश्यक असतो.
प्रक्रिया कशी असते?
1) विभाजनाची मागणी करणे
प्रथम, ज्या व्यक्तीला स्वतंत्र 7/12 हवा आहे. त्याने तलाठ्याकडे फाळणीचा अर्ज करावा लागतो. अर्जात आपला हक्क, शेतीचा हिस्सा, जमीन कोठे आहे? किती क्षेत्रफळ आहे? हे तपशीलवार लिहावे लागतात.
Crop Insurance : शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणी करून घ्या; अन्यथ पीक विमा अर्ज रद्द होणार!
2) आवश्यक कागदपत्रांची पूर्तता
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात जसे की, आपली ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र), जमिनीचा सामूहिक 7/12 उतारा, सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या सर्व मालकांची नावे व हिस्स्याचे पुरावे, वारस हक्क असल्यास वारसाचा दाखला किंवा उत्तराधिकारी प्रमाणपत्र, बांधकाम असल्यास बांधकामाचे कागदपत्रे
3) सर्व मालकांची संमती
जर त्या जमिनीवर अनेक मालकांचे नाव असेल, तर फाळणी करण्यासाठी त्यांच्या सहमतीची आवश्यकता असते. यासाठी सहमतीपत्र (NOC) सादर करावे लागते.
4) तलाठी व मंडळ अधिकारी तपासणी
तलाठी अर्ज प्राप्त करून प्राथमिक तपासणी करतो. प्रत्यक्ष शिवारात जाऊन जमीन मोजणी व ताबा तपासला जातो. कोठे बांधकाम, वाद किंवा अडचण नाही ना, हेही पाहिले जाते.
5) नोटीस व हरकती
जमिनीवरील सर्व मालकांना नोटीस पाठवून त्यांच्या हरकती मागवल्या जातात. कोणाला काही आक्षेप असल्यास त्या नोंदवल्या जातात. जर सर्वांची सहमती असेल तर प्रक्रिया पुढे जाते.
6) विभाजनाचा निर्णय
तपासणी पूर्ण झाल्यावर मंडळ अधिकारी फाळणीचा निर्णय देतात. त्यानुसार जमिनीचा हिस्सा विभागून स्वतंत्र गट तयार केला जातो.
7) नवीन 7/12 उताऱ्याचे वाटप
फाळणीचा आदेश लागल्यानंतर नवीन स्वतंत्र 7/12 उतारे तयार होतात. हे उतारे तलाठ्याकडून मिळवता येतात.
दरम्यान, फाळणीसाठी कोणी वडिलोपार्जित जमीन विकायला घेण्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते. जर जमीन वादग्रस्त असेल तर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
ऑनलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल पोर्टलवर यासाठी माहिती दिली जाते.