IMD Cyclone Rain Alert Today*५० किमी वेगाने वारा सुटणार, मुसळधार पाऊसही पडणार; ७ राज्यांना अलर्ट जारी*
*नवी दिल्ली*- सध्या हवामानात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागली आहे. त्यातच नवीन संकट उभे राहिले आहे. बंगालच्या खाडीत बदलणाऱ्या वातावरणामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अचानक बदललेल्या वातावरणाने अनेक राज्यांची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी ५० किमी प्रति वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. आकाशात वीज कडाडणार अन् समुद्रात उंच लाटा उसळणार आहेत. पुढील काही दिवस वातावरणात हे बदल दिसतील. डोंगराळ भागापासून दक्षिण भारतापर्यंत याचे परिणाम दिसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस, वीज कडाडेल आणि वेगवान वारेही सुटण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषत: बंगालच्या खाडी आणि दक्षिणेतील सागरी किनाऱ्यावर वातावरणात बदलाचे परिणाम दिसतील. हिमाचल ते तामिळनाडूपर्यंत वातावरण बदलेल. ७ राज्यांना विशेष इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या राज्यांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अनेक भागात ५० किमी प्रति वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे तापमानात २ ते ३ डिग्री घट होईल आणि थंडी वाढेल.
तर दक्षिण पुर्वेकडील बंगालची खाडी, अंदमान समुद्र आणि श्रीलंकेच्या किनारी भागात समुद्रात उंच लाटा उसळतील. त्यामुळे मच्छिमारांना या कालावधीत समुद्रात न जाण्याची सूचना दिली आहे. वेगवान वारे आणि वीज कोसळण्याच्या घटना घडू शकतात ज्यातून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दिल्ली एनसीआरमध्ये अचानक हवामानात बदल पाहायला मिळाला. भारतीय हवामान खात्याने मुसळधार पाऊस, वीज कडाडणे आणि सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. दुपारी अथवा संध्याकाळच्या सुमारास पावसाची चिन्हे दिसू शकतात.
दरम्यान, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वादळासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई आणि आसपासच्या किनारी भागात अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडेल. सकाळी उत्तर तामिळनाडूच्या काही भागात धुके पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे महामार्गांवरील दृश्यमानता प्रभावित होऊ शकते. जोरदार वारे आणि उंच लाटा येण्याच्या शक्यतेमुळे मच्छिमारांना सतर्क करण्यात आले आहे. किनारी भागात राहणाऱ्या लोकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.